★★★बलुत्यापुढची ठसठस★★★

मांग,गारूडी,चांभार,भंगी,मेहतर,रूखी,वाल्मिकी,वाघरी,साळी,कोळी,तेली,माळी,कुणबी,लेवापाटील,लेवा पटीदार,कुणबी,मराठा,तांबोळी,भंडारी,गोसावी,भोईर,लोहार,बेलदार,भराडी,गवळी,धनगर,पारधी,वंजारी,वडार,कोंचीकोरवा,कामाटी,मादिगी,हटगर,धोबी,शिंपी,न्हावी,पिंजारी,गोवारी,कोष्टी,मुन्नूर,गाबीत,मुजावर,पटवा, खाटीक, इ.अजून काही जाती-उपजाती-पोटजाती- मुळजाती-रक्तजाती- अधरजाती अभ्यासायच्या नजरेआड आहेत.त्यातल्या मोजक्या "जिण्यावर" हा लेख....

गेली हजारो वर्षें समाज दारिद्र्याच्या गुखाडीत रुतून पडला आहे.तो अज्ञानी आहे.भटका आहे.जीवन जगण्यासाठी भाकरीसाठी मौताग आहे.पोट नेईल तिकडं पळणारा आहे.स्थिर नाही.विकसित नाही.शिक्षणापासून वंचना झालेला समाज गरिबीत पिडलेला,पिळलेल्या आणि दबलेल्या आवाजात जगतो आहे.त्यास वास्तवाच्या जगाचे भान नाही असे नाही पण जी प्रगतीची प्रतवारी आणि परिवर्तनाची गती आहे ती त्याच्याकडे धीम्या वेगाने येत आहे.जो समाज स्थिर होत चालला आहे त्याहीपेक्षा भटक्या विमुक्त समाजाची स्थितीगती आणि त्यात बदल घडवून आणण्यासाठी त्यांचा विकास करणे हा एक मार्ग आहे.त्यापासूनही हा भटक्या विमुक्त समाज अलिप्त होत आहे.प्रवाहात टिकून राहत नाही.शिक्षण,आरोग्य,जमीन, कायदा,रोजगार यासंदर्भात समस्या आहेत.भटक्या विमुक्त समाजाची स्थिती सुधारण्यासोबतच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याठी प्रयत्न व्हायला हवेत.या समाजाच्या विकासाकरिता विविध योजनांचा लाभ पोहोचविण्याची आवश्यकता आहे.भटक्या विमुक्त जातीसोबत पोटजातीचाही विकास होणे गरजेचे आहे.शिक्षण व इतर सोयी-सुविधांचा लाभ मिळायला हवा.तसेच विमुक्त समूहातील अनेक जातीगटांकडे मतदार ओळखपत्र, रहिवासी दाखला नसल्यामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही.भटक्या विमुक्त समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावे,त्यांची शिक्षणाविषयी असलेली समस्या समजून घेणे या गोष्टीचा अभ्यास करताना भटके विमुक्त समाजातील महिलांचे सबलीकरण,निवार्‍याचे प्रश्न आणि भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळावा याकरिता करण्यात आलेल्या कायदे व नियम पाळणे गरजेचे आहे.अन्यथा विमुक्त- भटक्या जमातीच्या न्याय हक्कासाठी जागतिक न्यायालयात जाऊन दाद मागावी लागणार आहे.
वडार- " वडार समाजाचा आणि अन्य भटक्या विमूक्तांचा नुसता आत्मसन्मानच नव्हे तर इतिहासही हिरावला गेला. गड-कोट, लेणी, धरणे अशी अक्षय्यवास्तू साकारणारे समाजव्यवस्थेत रसातळाला जाऊन पोहोचले. इंग्रज काळात आणि औद्योगिक क्रांतीमुळे बहुतेकांचे परंपरागत व्यवसाय हिरावले गेले...कौशल्ये कुचकामी ठरवली गेली. आज देश स्वतंत्र असला तरी भटक्या-विमूक्तांचे प्रश्न सुटले नाहीत, भटकेपण थांबलेले नाही. सात-बा-यावर नांव नसल्याने बव्हंशी भटक्या-विमूक्तांचे मतदार याद्यांतही नांव नाही. जणू काही स्वतंत्र भारताने त्यांना नागरिकत्वच नाकारले आहे.

"भटक्या विमुक्त समाजांना आपापसातले मतभेद विसरुन न्याय्य हक्कांसाठी एकत्र आल्याखेरीज व अन्य बहुजन समाजांची साथ घेतल्याखेरीज आपले प्रश्न सोडवता येणे अवघड झाले आहे. कुंभमेळ्यावर अडिच हजार कोटी खर्च करु शकणारे राज्य सरकार भटक्या विमुक्तांच्या स्थायी निवास, शिक्षण व आरोग्यासाठी मात्र कसलीही तरतूद करु शकत नाही ही एक शोकांतिका आहे. जोवर मतपेटीची शक्ती एकत्रित करता येत नाही तोवर सरकारला लक्ष द्यायला भाग पाडता येणार नाही."
भटक्या विमुक्तांना खरंच कुठे न्याय मिळाला आहे ते आता वागतात तसेच भारत पारतंत्र्यात होता तेंव्हा वागत होते , भारतीय स्वातंत्र्य त्या नंतरची व्यवस्था त्यांच्या प्रगती साठी कमी पडले.हे स्पष्ट होते.
आदिवासी-आदीवासी घटक सोडलातर फासेपारधी व भटक्या विमुक्त यांना स्वताचे असे घर ही नाही दर दोनतीन महीन्याने पोटापाण्यासाठी स्थलांतर करावे लागते. या मुळे शिक्षण, नोकरी, शेती, उद्योग अशा घटकांपासून फार दूर आहेत.तेही भारतीय आहेत असे पांढरपेशी, मध्यमवर्गीय विसरलेत कींवा आम्हाला मिळालेल्या सवलतीत त्यांना वाटा नको अस त्यांच गणित असाव.वास्तव वेगळं आहे.इथे भट्क्या विमूक्त व पारधींना विषेश सवलत नाहीत.

४० वर्षांनी मरीआई समाजाने मारूती कोळी यांचेवरील बहिष्कार उठवला.मारूती कोळी,जत यांना मरीआई समाजाने तब्बल ४० वर्षे बहिष्कृत केले होते.अंनिस व भटक्या समाज संघटनेच्या प्रयत्नामुळे जत पोलिसांनी तेव्हा जातपंचाना बोलावून घेतले.त्यांना सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचा बडगा दाखवला.तेव्हा पंचांनी नरमाईची भूमिका घेऊन मारूती यांचा समाजात सामाऊन घेण्याचा निर्णय घेतला.पंचाच्या हस्ते पानसुपारी देऊन मारूतींच्या कुटुबांस मरीआई समाजात ४० वर्षेनी घेतले गेले.यावेळी त्यांचे डोळ्यात पाणी तरळले.

पारधी-भटक्या जमातीपेक्की एक, पारधी समाज, ब्रिटीश राजवटीत या समाजावर गुन्हेगारी शिक्का बसला आहे, त्याचे दुष्परिणाम आज हा समाज भोगत आहे आज हि त्यांना स्व:तच गाव नाही, आज इथे तर उघया तिथे मोकळ्या मेदानात पाल बांधून ते राहतात, त्याच्या रुढीचा, समस्यांचा अभ्यास सामाजिक कायकर्ते करत आहे.
सामाजिक संशोधनात पारधी विकास घेतात पण ते फक्त कागदावरच राहतात यावर कमाल म्हणजे संपूर्ण मानवी समाज, प्रशासन आणि पोलीसही आज १४२ वर्षानतर पारधी-भिल्ल, ठाकर, कातकरी, रामोशी, आदी जमातीकडे संशयाने पाहत आहे.
'चोर' हा पारध्यांना लागलेला डाग पुसून काढण्यासाठी आणि त्याना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत असले तरी ठिकठिकाणी रस्त्याकडेला, कधी बसस्थानक तर कधी तर कधी पुलाखाली पारधी बायका-पोरासह संसार थाटात आहेत. उघडीनाडि पोर, भिक मागत फिरणाऱ्या पारध्याच्या बायका आणि व्यसनाच्या आहारी गेलेले पारधी मायबाप सरकारला विनवणी करत आहेत. "ह्मन्या हाजूक राव्हाणु घर्कुनी " म्हणजेच आम्हाला अजून रहायला घर नाही.
ही मे जून ची घटना पारधी समाजाला आज पण लोक जवळ घेत नाही.सोलापूर जिल्हा तालुका माढा गाव बेबळे हे गाव.पारधी समाजाचे बेबळे या गावात काळे म्हणून पारधीचे काही घरे आहेत या लोकाना घर कुळ मंजूर अशुण सुधा गावतील लोक त्याना घर बाधन्या साठी जगा देत नसून गावठान ची जगाच्या उपलब्ध असून त्या ठिकाणी सुधा सरपंच या लोकाना घर बाधन्या साठी परमिशन देत नही.तर असेच जर पारधी समाजा बदल प्रत्येक गावत जर होत असेल तर पारधी समाजानी जाऊ तर जाऊ कुठे रहावं असा प्रश्न पडला आहे.
खरंच आहे. भारताला स्वातंत्र मिळाले आहे. पण अजूनही काही समाजाला स्वातंत्र मिळणे खूप गरजेचे आहे..
जाणू काही माणूस म्हणून जगण्याचा हक्क जो आहे. तो कडून घेतला आहे. अजूनही मूलभूतगरजा (अन्न, वस्त्र, निवारा )नसलेला हा एकमेव समाज मंज्जे पारधी.माझ्या या बांधवांना कोणत्याच सवलतीचा लाभ मिळत नाही. गावो -गावी 1/2 घर दिसत नाहीत.कारण त्यांना त्यांचा अधिकार मिळत नाही.गावात पाऊल टाकताच काही दिड शाहने त्यांना मारहाण करून, चोरीचा आरोप करून गावाबाहेर काढतात. तरी नाही ऐकल्यावर महिलांवर बलात्कार करून त्यांना दगडाने ठेचून मारून टाकतात. व पुरुषांना पोलिसांच्या हवाले करतात. बिचारे घाबरून गाव सोडून कुठे तरी रानात -वनात झोपडी टाकून राहतात...अश्याने कधी त्यांना माणूस म्हणून जगता येईल?खूप प्रश्न येतात..कधी कधी.त्यांना हक्क मिळेल.का?हा प्रश्न आहे पुढच्या काळात. न्याय या बांधवांना कधी मिळणार.?
पारध्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी राज्यभरात विविध संघटना प्रयत्न करत आहेत. मोर्चे , आंदोलने या सनदशीर मार्गाचा अवलंब करून शासन दरबारी न्याय मागण्या माड्न्यात आल्या यात काही प्रमाणात यश आले मात्र एवढ्या वर्षाच्या लढ्यानंतर हि पारधी कुटुंबाची भटकंती आजही सुरु आहे.

डोंबारी-डोंबारी जमातआयुष्यभर पाठीवर बिऱ्हाड घेऊन कधी इथं तर उद्या कुठं असा सतत भटकंती चे जीवन जगणारा एक समाज.काही कला आपसूकच केवळ उदरनिर्वाह चे साधन म्हणून प्रसिद्ध होतात.त्यातील एक कला म्हणजे डोंबऱ्याचा खेळ.वेड्यावाकड्या उड्या मारत समोरच्याची तारीफ पैशाच्या स्वरूपात मिळवून पोटाची खाचखळगी भरवणे एव्हढच काय ते त्यांच्या जीवनाचं ध्येय.याच मानसिकतेत गेली कित्येक वर्षांपासून हा समाज खितपत पडलाय.विकास नि आधुनिकता काय असते हे यांच्या खिजगणतीतही नसते.कधीकधी उपाशी पोटी देखील पोटासाठी नाचतो हा डोंबारी.ही मुळातच भटकी जमात असल्यानं सतत पोटासाठी, नवीन खेळ दाखवण्यासाठी फिरत असतात.जत्रेत,गर्दीच्या, रहदारीच्या ठिकाणी यांचे खेळ बघायला मिळतात.
"नाचतो हा डोंबारी र नाचतो हा डोंबारी"
हे गीत वाचायला जरी सोपे असले तरी त्यातून डोंबाऱ्यांच्या कष्टाची जाणीव होते.लहान निरागस मुलींचे पोट भरण्यासाठी लढू लागले.पण त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष काही कमी होत नाही.डोंबारी ही जमात आंध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगना,राजस्थान,तामीळनाडु, ओरीसा, हिमाचल प्रदेश,बांग्लादेश व महाराष्ट्रात आढळते.डोंबारी समाजाचा इतिहास फारसा मिळत नाही.महाराणा प्रताप यांच्या शेवटच्या लढाईत डोंबारी त्यांच्या सोबत असल्याचे काही लेखी पुरावे मिळतात तर छञपती शिवरायांच्या इतिहासात डोंबारी समाजाचे उल्लेख सापडतात.
महाराष्ट्रात डोंबारी राजस्थानमधुन भटकत आल्याचे बोलले जाते.डोंबारी हा सध्या तरी खेळ करुन भिक मागुन जगणारा समाज आहे.डोंबारी समाजात मुलीचे लग्न हे बालवयातचं केले जाते आणि हो लग्न करण्यासाठी तिला डोंबाऱ्याचे सगळे खेळ येणे बंधनकारक असतात.जर तिला हे खेळ येत नसतील तर अशा मुलींचे लग्न सुद्धा होत नाहीत.डोंबाऱ्याच्या घरी मुल जन्मल्यानंतर त्याला लहानपणापासून खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षण म्हणजे काय हो,६' इंचाच्या गोल रिंगमधुन संपुर्ण शरीर आत टाकणे व बाहेर काढणे हा खेळ प्रकार करताना त्या चिमुकल्या जिवाला असह्य वेदना होतात त्या जाणवु नये म्हणुन गावठी दारु पाजली जाते व लहान पाखरं अल्पवयातचं व्यसनाच्या आहारी जातात.
आॅल्म्पीक मधील खेळाडुंना ही लाजवेल अशा कसरती डोंबारी समाजातील मुली करतात.
डोंबारी समाजात एक प्रथा आहे ती म्हणजे अंघोळ न करण्याची.विशेष करुन महिलांना वर्ष-सहा महीने अंघोळ करु दिली जात नाही ज्यामुळे महिलांच्या अंगाचा वास येतो ज्यामुळे परपुरुष तिच्याकडे आकर्षीत होत नाही.
डोंबाऱ्याचं बिऱ्हाड आज या गावाला तर उद्या दुसऱ्या म्हणुन या अंघोळ न करण्याच्या प्रथेचा गावगुंडांपासुन आपली अब्रु वाचवण्यासाठी उपयोग होतो.
डोंबारी महिलांना स्वयंपाक येत नाही.ज्या गावात खेळ तिथेचं काही घरी भिक मागुण आपल्या कुटुंबाच्या पोटाची कशी-बशी आग विझवली जाते.
पुर्वी म्हणजे आमच्या लहानपणी डोंबाऱ्याचा खेळ आला की अर्धा गावं जमा होऊन हा खेळ पहायचां.त्याच्यामध्ये रिंगमधुन शरीर बाहेर काढणे,तारेवर बांबु घेऊन चालने,कोल्हाट उड्या मारणे,डोळ्यात सुई पकडणे अशे नानाप्रकारचे साहसी व धाडसी खेळ दाखवले जायचे.खेळ झाल्यावर जमलेले बघे आठ आणे,रुपया व जास्तीत-जास्त दहा रुपयं द्यायचे.माञ आता परीस्थीती बदललीयं! कालचं आमच्या गावी खुप दिवसानंतर डोंबारी कुटुंब खेळ करण्यासाठी आले माञ त्यांना बघणारे डोळेही कमी झाले आणि देणारे हातही.
बदलत्या काळात हा समाज खुप पाठीमागे राहिला.या समाजाला शासनाच्या कुठल्याही योजनेचा फायदा झाला नाही.हा समाज सुधरला पाहिजे यासाठी लातुरमधील आमचे मिञ नरसिंग झरे यांनी प्रयत्न सुरू केले.त्यांनी सर्वप्रथम या डोंबाऱ्याना लातुरमधील अनसर वाड्यावर स्थाईक केले.येथे त्यांना स्वयंपाक करायचे शिकवुन डोंबारी महीलांना रोजगार मिळवुन दिला.डोंबारी पुरुषांना बॅंड पथकाचे प्रशिक्षण देऊन व्यसनांपासुन परावृत्त केले.
डोंबारी समाजातील मुले आता नरसिंग झरेंच्या सांगण्यावरुन शाळेत जातात.निश्चितच ही चांगली बाब आहे.माञ आजही हा समाज न्यायापासुन वंचीत आहे.शासन या बाबतीत उदास आहे.भटक्या विमुक्त अशा ५२ जाती एकट्या महाराष्ट्रात आहेत.एकीकडे
बुलेट ट्रेन येते.ती श्रीमंतांच्या चैनीसाठी आवश्यक आहे परंतु खेड्यात राहणाऱ्या वंचीत जातींना मुलभुत सुविधा तरी मिळायला हव्यात.

कोळी - कोळी ही जमात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश इ. राज्यांत आढळते. ढोर कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी असे कोळ्यांचे वर्ग आढळतात. महाराष्ट्रात कोळ्यांचे मुख्यत्वे दोन वर्ग पडतात : मासे मारणारे आणि शेती करणारे कोळी. महाराष्ट्रात मासे मारणारे कोळी सोनकोळी या उपजातीत आढळतात. महादेव व मल्हार कोळी यांचा समावेश अनुसूचित जमातीत होतो. या कोळ्यांचे कुणब्यांशी अनेक दृष्टींनी साम्य आहे. ते कोकणात व देशावर आढळतात. त्यांच्या शाखा डॉ. विल्सन यांनी पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत : आग्री, अहीर, बंद, भिल्ल, भिलावे, भिरले, चंची, दोर अगर टोकरे, हेलमार, कब्बेर, कराडे, खार, कोकण, महादेव, डोंगर ऊर्फ राज, मल्हार अगर कुनुम, चुमली, पान अगर पानभरी, मराठा, माखी, मेंदाले, मेता अगर धनगर, मुसळे अगर बंधू, नेहरे, राहताडकर, शिंग तोकी, सोन, सोलेसी (काष्टी अगर लाल लंगोटी), सूर्यवंशी, तायडे, ठाणकर अगर ख्रिस्ती व वली.
या जमातीचे मुख्य गट म्हणजे मल्हार कोळी, महादेव कोळी, सोनकोळी व ढोर कोळी. ढोर कोळी हे सर्वांत कनिष्ठ समजले जातात. जव्हारचे महाराज महादेव कोळी आहेत.कोळी सह्याद्रीत पुणे ते मुळशीपर्यंत व पुणे ते त्रिंबकपर्यंत आढळतात. जव्हारलाही यांची वस्ती आहे. बालाघाट ऊर्फ महादेव डोंगरात त्यांचे मूळ वसतिस्थान असावे, असे परंपरा सांगते. अहमदनगर जिल्ह्यातही ते आढळतात. महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांपैकी पानभरे कोळी हे गडकरी होते. गडसंरक्षणाचे काम ते करीत. महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत. खंडोबा आणि एकवीरा देवी ही तर सर्वच कोळ्यांची दैवते आहेत. परंतु महादेव कोळ्यांची वरसुबाई ही रोग बरी करणारी विशेष देवता आहे. त्यांच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार कुणब्यांप्रमाणेच आहेत.वाघदेव, मारुती, राम, शिव, कृष्ण इ.देव ते मानतात.दसरा, दिवाळी, अक्षय्यतृतीया वगैरे सण ते पाळतात. कमलजा देवीलाही ते पूजतात. कळसुबाई, जाकुबाई, सतुबाई, रानाई ऊर्फ रानबाई वगैरेही काही देवींना ते मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ते ‘कणस्त्री’ ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. विठोबाचे माळकरीही यांच्यात आढळतात. यांचा नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असतो. त्यांच्या समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे.
कोळी पुरुष व मुलगी यांचा व्यवसाय शेती व जंगलातले पदार्थ गोळा करण्याचा असतो. यांचे संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. मूल जन्माला आले, की त्याच्या अंगावर गार पाणी ओततात. त्याला ‘ओपसावणी’ म्हणतात. बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी त्यांची समजूत आहे. पाचवीला साठीची पूजा करतात. जमलेल्या आप्तेष्टांत पाच भाकरी व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचे पाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून गृहदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. यांच्यात जावळ काढण्याचा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवार अगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात.
मृताला ते जाळतात किंवा पुरतात. यांच्यात लग्न असगोत्र घराण्यांत होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात असे दिसते. उदा., बांबळे गोत्रीयांचे लग्न गोडे, हिले, झांजरे, नाडकर आणि पिचड यांच्याशी होते. भरमल गोत्रीयांचे लग्न गबाळे, पेडेकर यांच्याशीच होते.
पूर्वी बालविवाह प्रचलित होता, परंतु अलीकडे सरासरी मुलाचे वय पंधरा-सोळा आणि मुलीचे त्याहून कमी असताना त्यांची लग्ने होतात. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे देज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. ठाकूरांप्रमाणे कोळ्यांत लग्नाची गाणी गाणारी धवलारीण नसते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. यांच्यात बहुपत्नीत्व रूढ आहे.

मल्हार कोळी -हे मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. यांना पानभरी कोळी असेही म्हणतात. हे नाव त्यांच्या पाणी भरण्याच्या कामावरून पडले असावे. हे ठाणे, मुंबई व देशावर आढळतात. यांच्यात भोईर, जाधव, केरव, लांग, पोवार, शरणपाद, शेलार, गायकर , मढवी सोज्वळ आणि वेखंडे ही नावे आढळतात. पंढरपुराजवळ पुष्कळ मल्हार कोळी येसकर (वेसकर) म्हणून आढळतात. अहमदनगर जिल्ह्यात बरेचजण शेती करतात. मराठेशाहीत सिंहगड, तोरणा व राजगड यांचे वंशपरंपरागत रक्षक (गडकरी) हे कोळीच होते. ठाणे जिल्ह्यात अनेक मल्हार कोळी कुणब्यांत समाविष्ट झाले. १९६१ च्या शिरगणतीप्रमाणे यांची लोकसंख्या ८९,०४७ होती.

गुजराती कोळी-गुजरातमधल्या कोळ्यांवर राजपूत संस्कार आढळतात. काही कोळी राजपूतांप्रमाणे विधवाविवाह करीत नाहीत. गुजरातमध्ये यांची संख्या २२,८७९ (१९६१) होती. खेडा जिल्ह्यात कोळ्यांची संख्या फार आहे. पालनपूर, साबरकाठा व पंचमहाल येथे त्यांची वस्ती आहे. हे कोळी शूर पण प्रसंगी लूटमार करणारे, म्हणून ओळखले जातात.त्यांची गोत्रे स्थलपरत्वे निवडतात.(१) पालनपूर : ठाकरडा, कोळी. (२) महिकाठा : तळाबदा, चुनवालिया, पाटणवाडिया, चरोतरिया. (३) खेडा : खांट, बारिया, तळाबदा (कोतवाल, बारिया) पाटणवाडिया. (४) अहमदाबाद: तळाबदा ऊर्फ पटेलिया, ठाकरा व चुनवालिया. (५) पंचमहाल : खांट, बारिया व पटेलिया. (६) भडोच आणि सुरत : तळाबदा, मांघाता, रोरोरारिया ऊर्फ मानसोरोरारिया, बारिया, धाराळा, पाटणवाडिया, भाळिया, इंदोरिया, तळाबदा इत्यादी. यांतील खेड्यातल्या कोळ्यांचे साहचर्य माळव्यातल्या भिल्लांशी होते आणि ते ब्रिटिशांनाही जिंकायला भारी पडले.
मध्य प्रदेशातील कोळी- रसेल व हिरालाल यांनी मध्य प्रदेशातील कोळ्यांचे भिल्लांशी अनेक बाबतींत साम्य आहे, असे म्हटले आहे. हे भिल्ल म्हणजे पश्चिम सातपुड्यातले-खानदेशातले भिल्ल होत.
विदर्भातील व खानदेशातील कोळी- याच वर्गातले आहेत. भिल्लांप्रमाणे यांनाही नाईक या सन्मानार्थ नावानेच हाक मारतात. वऱ्हाडात या कोळ्यांनी खिंडीचे रक्षण करण्याचे काम केलेले आहे. भिल्लांच्या प्रमाणेच कोळीही गुन्हेगार म्हणून या भागात ज्ञात होते. लोक त्यांना भीत असत. दरोडे घालणे, खून करणे वगैरे प्रकारांत ते पुढाकार घेत असत. निमाड जिल्ह्यात कोळ्यांची वस्ती पुष्कळ आहे. मध्य प्रदेशात कोळ्यांच्या पाच जाती आहेत : सूर्यवंशी, मल्हार, भिलावफोड, शिंगाडे व मुसलमान. सूर्यवंशी हे आपण राजपूत आहोत, असे म्हणतात. मल्हार ऊर्फ पानभरी हे मल्हारीचे पूजक असून महाराष्ट्रीय आहेत. हे बिब्बे फोडण्याचा धंदा करतात.

मेहतर- सफाई कामगार अर्थात भारतातील मेहतर समाज. हजारो वर्षापासून उच्चवर्णीयांच्या घाणीला साफ करण्याचे काम करतो आहे.
"मेहतर लोक तर स्पृश्य लोकांना एका क्षणात नमवू शकतील. त्यांचा धंदा जरी नीच मानण्यात आला तरी त्या धंद्याची उपयुक्तता इतकी जबरदस्त आहे की, त्यांनी मनात आणले तर रोगाचे सत्र सार्या शहरात पसरून ते सारी वस्ती नामशेष करण्यास कारणीभूत होऊ शकतील"
महार- महार वतनामध्ये गावात स्वच्छता ठेवण्याचे काम जे महारांच्या शिरावर ठेवण्यात आले होते ते कसे बेकायदेशीर आहे हे सांगतांना बाबासाहेब म्हणतात.
ठराव क्र. ६ गावात स्वच्छता ठेवणे हे महारांचे एक काम आहे असे ता. २८ जून १८८८ च्या ४२७३ च्या सरकारी ठरावाने ठरविण्यात आले. परंतु वतनदार कामगारासंबंधाच्या कायद्याच्या चौथ्या कलमाशी हा ठराव विसंगत आहे, तरी तो सरकारने ताबडतोब रद्द कारवां, अशी या परिषदेची आग्रहपुरःसर सुचना आहे"… ठराव क्र ७ हे वतनदार कामदारासंबंधांच्या कायद्याच्या चौथ्या कालमावरून व सदरील ठरावावरून स्पष्ट होते. तरी महारांना रयतेच्या खाजगी कामाच्या जबाबदारीतून
मुक्त करणे अवश्य आहे. असे या परिषदेचे मत आहे.
म्हणून ठराव ताबडतोब रद्द करवां आणि "जबाबदारीतून मुक्त करणे" हे वाक्य सफाई कामाच्या निषेधाचे द्योतक आहे. सफाई काम, 'सफाई काम करणाऱ्या गर्भवती महिलेला आपल्या मुलासाठी सफाई कामगाराच्या पदाची भूल पडते' अश्या आशयाचे उदगार बाबासाहेबांनी काढले आहे.हजारो वर्ष उच्चवर्णीयांची घाण साफ करण्याची मेहतर समाजाची मानसिकता महात्मा गांधींना प्रिय होती. म्हणून त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सफाईच्या कामाचे उदात्तीकरण केले. मेहतर समाजाने हे काम कधीच सोडू नये या साठी गांधींनी स्वतः हातात झाडू घेऊन मेहतर समाजाला मानसिकरीत्या 'ब्ल्याकमेल' केले.
आपले राज्यकर्ते तेच करता आहेत. मेहतर समाजाला उच्च पदे देऊ शकत नाही कारण त्यांचा धर्म तशी मुभा देत नाही. त्यांची धर्मसंसद समस्त दलितांच्या उत्थानाच्या विरुद्ध आहे. म्हणून तो सफाईकामाचे उदात्तीकरण करतोय. आमच्या गृहिणी किंवा आम्ही सफाई काम घरात करतोच पण… समाजकार्य म्हणजे फ्याशन समजणारे, अंबानी, अमिताभ इत्यादी गर्भश्रीमंत माणसे मोदीच्या या वर्णव्यवस्था मजबूत करण्याच्या आणि सफाईकामच्या पावित्र्याच्या जातीयवादी कामात हातभार लावताहेत. फक्त एक दिवस सफाई करून ही माणसे पुन्हा शेकडो वर्ष मेहतर लोकांना त्याच कामात गुंतवून ठेवण्याच्या कामात लागले आहेत. मा नरेंद्र मोदी म्हणतात… कलम को झाडू बनावो आणि बाबासाहेब झाडूला कलम बनवायला सांगतात.. हाच फरक आहे गांधी, मोदी आणि बाबासाहेबांमध्ये. बाबांना झाडूवाला जज पाहायचा आहे आणि गांधी व मोदीला झाडूवाला मेहतर जगाच्या अंतापर्यंत हवा आहे… कारण हाच हिंदू धर्मशास्त्रांचा संकेत व कायदा आहे जो कोणताही हिंदू स्वप्नातही तोडू शकत नाही आणि धर्ममार्तंड ते तोडू देत नाही. ज्या दिवशी वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाला बाबासाहेब समजतील तेव्हा, गांधी व मोदी जमीनदोस्त होतील.
संदर्भ- बहिष्कृत भारत : २३ डिसेंबर १९२७
२ बहिष्कृत भारत : २ सप्टेंबर १९२७

वैदू- वैदू हा मुळचा आंध्रामधला वैदू समाज. मातृभाषा तेलगू. फिरत फिरत कधीतरी महाराष्ट्रात आले असतील. घरं बांधून वाडी वसवली असेल. उसाच्या पट्ट्यात वस्ती करतात. मुबलक काम पण गडीमाणसं रोजंदारीवर जात नाहीत. बाया शेतमजूरीची कामं करीत नाहीत. जमीन जूमला नाही, मग जगायचं कसं ? पारंपरिक धंदा अधुनिकीकरणाने कधीच बसलाय. डबे चाळण्यांना गिर्‍हाईक उरलं नाही. स्टोव्ह गेले. आता खेडोपाडी गॅस आले. बायांच्या आरसा फणी कंगवा ला किती गिर्‍हाईक मिळणार ? भिक मागत दिवसाचे साठ सत्तर मिळवण्यासाठी बाया वाड्यावस्त्या पालथ्या घालतात. भिकाऱ्याची कळा. कुत्री लगेचच ओळखतात. एका हातात काटेरी फांदी घ्यायची. भुंकणाऱ्या कुत्र्यावर लक्ष ठेवत दुसरा हात डोक्यावरच्या गठूळ्याला द्यायचा. काखेला अडकवलेल्या झोळीत तान्हं पोरगं. उन्हाच्या कारात दिवसभर फिरणं व्हायचं. पण आता वस्ती वस्तीवर दुकानं झालीत.दुकानात सगळं काही मिळतं, वैदीनीकडून कोण वस्तू विकत घेणार ?ही खरी ठसठस आहे.
महारांना चांभार स्पर्श करीत नव्हते.कारण ते महार समाजा पेक्षा स्वत:ला उच्च मानत हाेते.चांभार आणि महार या दाेन्ही जाती एकाच वर्गातील हाेत्या.तरी सुद्धा त्यांच्यात उच्च - नीचतेची भावना हाेती. चांभार स्वत: ला महार समाजा पेक्षा श्रेष्ठ समजत हाेते.महाराना स्पर्श करीत नव्हते.महार माणसालाच नव्हे तर त्याच्या पायतानाला सुद्धा स्पर्श करीत नव्हते.किती पराकाेटीची जातीयता !

भारतीय समाज व्यवस्थेत जातीयता का टिकून राहिली ? असा प्रश्न निर्माण झाला तर त्याचे उत्तर आहे, ती टिकनवून ठेवण्यात ज्या त्या जातीचाच माेठा वाटा आहे.काेणत्याही जातीला आपली जात साेडायची नाही.दलित जातीपैकी ज्या जाती प्रगत झाल्या किंवा विकसीत झाल्या त्या तर अतिशय घट्टपणे जातीला चिकटून आहेत. शिक्षणामुळे माणूस जाती बाहेर पडेल असा विचार अनेकांनी मांडलेला आहे. पण झालंय उलट ! शिक्षणामुळे जातीत रहाण्याचे फायदे लक्षात आले.त्यामुळे शिक्षित वर्गाने जाती व्यवस्थेला वंगण घातले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.म्हणूनच जातीव्यवस्थेचा गाडा शेकडाे वर्षे छान प्रवास करताे आहे.दलित समाजात नवा चातुर्वण निर्माण झालेला आहे.ही त्या शोकांतिका त्या त्या काळातील आहे, त्या काळात सामाजिक प्रगती म्हणावी तशी झालेली नव्हती. तरी माणसे एकमेकाला समजून घेत हाेती.एकमेकाला सहकार्य करून गावगाडा चालवित हाेती. पण ती माेडण्यासाठी समाजाचे मानसिक परिवर्तन हाेणे आवश्यक आहे.

१९८० नंतर महाराष्र्टात जाती-जमातीच्या नावाने संघ,संघटना,पक्ष अस्तित्वात आले.याचे कारण त्यांना त़्यांचे प्रश्न सुटत नसल्याची जाणीव झाली.त्यामुळे आपल्या प्रश्नांना सोडविणे गरजेचे आहे
शिवस्वराज्यात लायकीप्रमाणे काम मिळत होते. लायकीप्रमाणे दाम मिळत होते.. लायकीप्रमाणे स्थान मिळत. हेच सूत्र फ्रान्सच्या नेपोलियनला पूर्णपणे सांभाळता आले नाही. जिंकलेल्या नवनवीन प्रदेशावर नेमायला नेपोलियनला नातलग , सगेसोयरे अपुरे पडले. त्यामुळे गुणवत्ता ढासळली. अखेर सम्राट झालेला नेपोलियन ब्रिटीशांचा कैदी म्हणूनच तुरुंगात मरण पावला.पण योग्य लायकी असलेल्या नातलगालाही टाळायचे का ?

रामोशी- रामोशीतला बहिर्जी नाईक. हा बहिजीर् योग्यतेने राजकुमारच ठरावा अत्यंत धाडसी , अत्यंत बुद्धिमान , अत्यंत विश्वासू , तिखट कानाचा आणि शत्रूच्या काळजातलही गुपित शोधून काढणाऱ्या भेदक डोळ्याचा , बहिरी ससाणा होता.नजरबाज खात्याचा सुभेदार नेमलेला होता. सुभेदार म्हणजे त्या खात्याचा सर्वश्रेष्ठ अधिकारी. हेरखात्याचा मुख्य अधिकारी होणे ही सामान्य गोष्ट आहे का ? त्याची बुद्धिमत्ता आणि चातुर्यप्रतिभा असामान्यच होती. अनुभवाने ती असामान्यच ठरली. वास्तविक रामोशी समाज हा लोकांनी ( अन् पुढच्या काळात ब्रिटीशांनी) गुन्हेगारच ठरवून टाकला. पण त्यातील हिरे आणि मोती महाराजांनी अचूक निवडले. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आणि दौडत्या सैन्यातही रामोशी ‘ नाईक ‘ मंडळी आवर्जून नेमली.
स्वराज्य बुडून इंग्रजी अंमल आल्यानंतर पुरंदरच्या परिसरातला भिवडी गावचा एक तरुण होता, उमाजी नाईक रामोशी. त्याचे आडनांव खोमणे. सारे मराठी स्वराज्य बुडाले, म्हणजे आम्हीच बुडवले. हा उमाजी नाईक एकटा स्वराज्य मिळविण्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठला. चार जिवलग मिळविले. आणि इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याकरता हा रामोशी आपल्या दोन पुत्रांनिशी उठला. त्याच्या एका मुलाचे नाव होते , तुका. दुसऱ्याचे नाव होते म्हंकाळा.उमाजीने उभारलेले बंड. इंग्रजांचे राज्य मोडून छत्रपतीचे राज्य स्थापन करण्याचा त्याचा तळमळीचा हेतू होता.एका उमाजी नाईकाच्या काळजात स्वराज्य विसावले होते.
कॅप्टन मॅकींगटॉश या इंग्रज अधिकाऱ्याने उमाजी नाईकाला पडकले अन् फाशीही दिली. पण त्याच कॅप्टनने उमाजी नाईकाचे चरित्र लिहिले. छापले. त्यात तो कॅप्टन म्हणतो , ‘ हा उमाजी म्हणजे यश पावलेला होता. ‘ मन भावना आणि त्याप्रमाणे कर्तबगारी ही जातीवर अवलंबून नसते. बहिजीर् नाईक आणि उमाजी नाईक हे सारखेच. एक यशस्वी झाला , दुसरा दुदैर्वाने अयशस्वी ठरला. दोघेही शिवसैनिकच.
दिलेरखान पठाणाशी पुरंदरचा किल्ला साडेतीन महिने सतत लढत होता. दिलेरखानला पुरंदर जिंकून घेता आला नाही. त्या पुरंदरावर रामोशी होते , महार होते , धनगर होते , मराठा होते , मातंग होते , कोळी होते , कोण नव्हते ? सर्वजणांची जात एकच होती. ती म्हणजे मावळे. चंदपूर , गडचिरोलीपासून कारवार , गोकर्णापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातील अगणित समाजसमुहातील माणसे निवडून गोळा झालेले. त्यात धर्म , पंथ , सांप्रदाय , जाती- जमाती , भाषा , रीतरिवाज कधीही मोजले नाहीत. राष्ट्र उभे करावयाचे असेल , तर लक्षात घ्यावा लागतो , फक्त राष्ट्रधर्मच. अन् निर्माण करावे लागते राष्ट्रीय चारित्र्य. स्वराज्याचा पहिला पायदळ सेनापती होता नूर बेग. आरमाराचा एक जबर सेनानी होता दौलतखान. साताऱ्याजवळच्या वैराटगड या किल्ल्याचा किल्लेदार होता एक नाईक. एक गोष्ट लक्षात येते की , शिवकालीन स्वराज्याचा इतिहास म्हणजे सर्व समाज शक्तींचा वापर व सुराज्य होता.पन आज रामोशी ताकदीच्या व बुद्धीच्या नकाशावरून नष्ट झालेला आहे.
भटक्या विमुक्त जाती- पारधी, आदिवासी समुहातल्या लोकांची समस्या भीषण आहे. त्यांचा कधीच मोर्च्या निघत नाही, त्यांची जिदंगीच एक मोर्चा एक विस्थापन असते. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात विकासात सामावुन घ्या अशी मागनी असनं तर दुरच पण असं त्याचं ध्यानीमनी सुद्धा येत नाही. कोणी मागत नाही म्हणून कोणी काही देऊच नाही का ? हो तर हे असंच आहे, सत्ता हाती आसण्याऱ्यांचे शोषन होत आहे.भटक्या विमुक्तांची, पारधी, आदिवासांची लोकसंख्येच्या अभावामुळं शोषितांना वंचिताना न्याय देण्याची भाषा तोंडी येत नसेल, तर काळ समाजाने समजला पाहिजे.

तळटीप- सदर लेख vishwanath sathe ब्लॉगवरही उपलब्ध आहे.टीकाटिप्पणीसाठी,मत,मतांतरे,त्रुटी,संवाद, सूचना,निवेदन,वा माहिती व्यक्त व्हावी.... ब्लॉग व इथे खालील कमेंट्स बॉक्स उपलब्ध आहे...व्यक्त व्हा.

-विश्वनाथ साठे[9921056462]

Comments

  1. ★★★बलुत्यापुढची ठसठस★★★ या लेखातील खालील वाक्याबद्दल आपणाकडे काही ऐतिहासिक पुरावा असल्यास देवू शकता का, ही एक नम्र विनंती.
    "कोळ्यांपैकी पानभरे कोळी हे गडकरी होते. गडसंरक्षणाचे काम ते करीत"

    ReplyDelete
    Replies
    1. माफ करा उत्तर द्यायला थीदा उशीर झाला. दीर्घ लिखाणात होतो. माझ्या वाचनात असे आहे की, मल्हार कोळी हा महाराष्ट्रातील एक समाज आहे. ह्या समाजातील लोक मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. यांना पानभरी कोळी असेही म्हणतात. हे नाव त्यांच्या पाणी भरण्याच्या कामावरून पडले असावे.हे मल्हार कोळी येसकर (वेसकर) नाव लावतात. अहमदनगर जिल्ह्यातील मल्हार कोळ्यांपैकी बरेचजण शेती करतात.हे लोक मराठेशाहीत सिंहगड, तोरणा व राजगड यांचे वंशपरंपरागत रक्षक (गडकरी) होते. ठाणे जिल्ह्यात अनेक मल्हार कोळी कुणब्यांत समाविष्ट आहेत.बोलींत 'ळ' अक्षरासाठी 'ल', 'मला' शब्दासाठी 'मना', करतो, देतो या शब्दांसाठी करतांव, देतांव हे शब्द वापरले जातात. साधारणपणे अलिबाग, पेण, रोहा, खालापूर, मुरुड या भागांत 'आगरी' व 'बाणकोटी' या दोन्ही बोली सारख्याच प्रमाणात बोलल्या जातात. आगरी-बाणकोटी या बोली बोलणारे लोक हे आगरी, कोळी, गवळी, क्षत्रिय मराठा, कुणबी या समाजांतले असतात त्याप्रमाणे इतर जातिप्रवर्गातील तसेच जमातीतील काही लोक ह्या बोली बोलतात. उदा.- तुमच नाव काय?= तुमचां नांव कायमला काय माहित?= मना काय/कय म्हाईत? ती मला जेवायला देते = ती मना ज्यावायला देते.ह्या झाडाखाली बस= हे झाडाखाली बस. माझी आजी आजारी आहे = मांजी बय आजारी हाय. ह्याचे किती पैसे घेतले त्याने?= ह्याचं किती पयशे घेतलान त्यानी? तुम्ही आलात काय?= तुमी आलंव काय? काय करताय? =काय करताव? तुम्ही घरी केव्हा जाल = तुमी घरी कदी जाल इ. औरंगाबाद,ठाणे,पालघर , मुंबई व देशावर आढळतात. यांच्यात मोरे,भोटकर,दांडगे, मढवी, भोईर, जाधव,तुंबडा, हाडल,तांडेल,मातेरा, सुतार, केरव, लांग, पोवार, शरणपाद, शेलार, धांगडा ,बुंधे,सोज्वळ,सातवी,ठाकरे,वावरे आणि वेखंडे ही आडनावे आढळतात. त्याचबरोबर सह्याद्रीत पुणे ते मुळशीपर्यंत व पुणे ते त्रिंबकपर्यंत आढळतात. जव्हारलाही यांची वस्ती आहे. बालाघाट ऊर्फ महादेव डोंगरात त्यांचे मूळ वसतिस्थान अभ्यासायला मिळते.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog